Jayakumar Gore | प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना आता ग्रामीण भागात 50 हजार रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. याबाबतची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या निर्णयाला मान्यता दिली असून, बजेटमध्ये यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PM Aawas Yojana) ग्रामीण भागातील घरकुलांसाठी मिळणारा एकूण निधी 2 लाख 10 हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. यासाठीचे अतिरिक्त अनुदान राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती गोरे (Jayakumar Gore) यांनी दिली.
मंत्री गोरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने वर्षभरात 20 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा संकल्प घेतला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 लाख घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये 10 लाख 34 हजार घरांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे, जो केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देण्यात आला. उर्वरित 10 लाख घरांना लवकरच हप्ता देऊन काम सुरू केले जाईल.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात मोठ्या घरकुलांच्या उद्दीष्टाची प्राप्ती झाली आहे. या उद्दीष्टासाठी केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क साधला होता, अशी माहिती त्यांनी दिली. 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पहिल्या 45 दिवसांत 100 टक्के घरकुलांना मान्यता देण्यात आली असून, त्यानंतर 10 लाख 34 हजार घरांना हप्ता वितरित केला गेला आहे.
मंत्री गोरे म्हणाले, “आम्ही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. ग्रामीण भागात घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे, आणि त्यासोबतच सरकारने घरकुलांच्या गुणवत्तेची खात्रीही केली आहे.”
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भागांतील घरांच्या कमतरतेला दूर करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या मागणी-आधारित सर्वेक्षणावर आधारित निधी मंजूर करण्याचा अधिकार आहे, ज्यामुळे सरकारच्या सर्वांसाठी घरांची उपलब्धता सुनिश्चित होईल.
हेही वाचा:
• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा! आता मोफत घरांसोबत वीजही मिळणारं मोफत