Gharkul Anudan | ग्रामीण भागातील बेघर आणि गरीब कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे कार्यरत आहे. आता या योजनेतील दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती लक्षात घेता, राज्य सरकारने घरकुल अनुदानात तब्बल ५० हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी (Gharkul Anudan) दोन लाखांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे.
या निर्णयानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मूळ अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना १ लाख २० हजार ऐवजी १ लाख ७० हजार रुपये अनुदान मिळेल. विशेष म्हणजे, या वाढीव अनुदानातील १५ हजार रुपये छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री सूर्य घर’ योजनेच्या माध्यमातून ही तरतूद करण्यात आली आहे. जर लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यास इच्छुक नसेल, तर त्याला हे १५ हजार रुपये मिळणार नाहीत.
सौर ऊर्जा यंत्रणा बसवल्यास ग्रामीण भागातील घरे प्रकाशमय होतील आणि विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त, घरकुल बांधकामासाठी मनरेगा अंतर्गत मजुरीची रक्कम आणि शौचालय बांधकामासाठी मिळणारे अनुदान देखील कायम राहणार आहे. या दोन्ही बाबींची मिळून साधारणपणे ३८ हजार रुपये रक्कम लाभार्थ्यांना मिळते. त्यामुळे आता एकूण अनुदानाची रक्कम सुमारे दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.
केंद्र सरकारचे ‘सर्वांसाठी घरे’ हे धोरण असून, याच उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून, पुढील पाच वर्षांसाठी तो कार्यान्वित असेल. या टप्प्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आता लाभार्थ्यांचा नव्याने सर्व्हे केला जाणार आहे. त्यामुळे जे पात्र नागरिक पहिल्या टप्प्यात योजनेपासून वंचित राहिले होते, त्यांना आता लाभ मिळण्याची संधी मिळणार आहे.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू लोकांना मोठा आधार मिळणार आहे. घरकुल अनुदानात झालेली ही वाढ निश्चितच त्यांना दर्जेदार आणि टिकाऊ घरे बांधण्यासाठी उपयुक्त ठरेल. वाढलेल्या आर्थिक मदतीमुळे आता लाभार्थी अधिक चांगल्या दर्जाचे बांधकाम करू शकतील, ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल यात शंका नाही. शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
हेही वाचा:
• अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान; कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान