Bhoom Accident | भूम-खर्डा-जामखेड रोडवरील उळूप फाट्यावर सोनारी दुध डेअरीसमोर दोन दुचाकींच्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन युवक जखमी झाले. ही घटना २८ फेब्रुवारीच्या दुपारी सुमारे चार वाजता घडली. (Bhoom Accident)
अपघाताची माहिती अशी आहे की, भूमकडून बऱ्हाणपूरकडे जात असताना, मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने जोरदार वेगात येऊन समोरच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत गणेश गौतम वारे (वय ४०, बऱ्हाणपूर, ता. भूम) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, सौरभ शेषेराव (वय २२) आणि दुचाकीवरील इतर दोन तरुण, कल्याण सुभाष काळे (वय १८) व रामा अशोक काळे (वय १७), हे जखमी झाले आहेत. जखमींवर भूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर दगडे ठेवून रास्ता रोको केला. नागरिकांचे म्हणणे आहे की, या ठिकाणी वारंवार अपघात होतात, कारण येथे वेगमर्यादा फलक नसून रस्त्यावर वाहनांचा वेग अधिक असतो. स्थानिकांच्या मागणीला प्रतिसाद देत, पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी आणून, तात्काळ गतीरोधक बसवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रस्ता रोको मागे घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघाताच्या ठिकाणी मागील काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, नागरिकांचे प्राण गेले आहेत. अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर गतिरोधकांचा अभाव आणि अपार वेग आहे. नागरिकांनी सात महिने अगोदर बांधकाम विभागाकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती, परंतु आजतागायत त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आहे, आणि त्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देण्याची गरज आहे. घटनेचे अधिक तपास पो.हे.कॉ. देवकर करत आहेत.
हेही वाचा:
• मोबाइलवर घरबसल्या करा रेशनसाठी ई-केवायसी; सोप्या पद्धतीने कसे कराल, वाचा सविस्तर
• जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई